NCT NCT कवठेमहंकाळ तालुक्यात बदलत्या हवामानाचा द्राक्ष बागेना फटका, उत्पादन घटणार

कवठेमहंकाळ तालुक्यात बदलत्या हवामानाचा द्राक्ष बागेना फटका, उत्पादन घटणार


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे वार्ताहर(जालिंदर शिंदे) :- नगदी पीक व पोषक वातावरण म्हणून कवठेमहंकाळ तालुक्यातील बळीराजानी इतर पीकाला फाटा देत द्राक्ष शेतीला मोठी पसंती दिली.त्यामुळे कवठेमहंकाळ तालुक्यात द्राक्ष लागवड क्षेत्रही मोठ्या प्रमाणात वाढले आहे.परंतू या क्षेत्राच्या मागचं काष्ठ काही संपता संपेना असे झाले आहे.कधी अवकाळी,कधी दुष्काळ,कधी रोगांचा प्रादुर्भाव तर कधी पडता बाजारभाव यांचा फटका सहन करावा लागत आहे.
 चालू वर्षी तर लांबलेल्या पावसाने कवठेमहंकाळ तालुक्यात द्राक्ष बागांच्या उशीरा छाटण्या घेण्यात आल्या.त्यामुळे सध्या द्राक्षबागा या काही ठिकाणी फाऊरिंग स्टेजला तर काही ठिकाणी फळधारणा अवस्थेत आहेत.परंतू सध्या पडत असलेल्या दिवसभर कडाक्याचे ऊन,रात्री कडाक्याची थंडी तर पहाटे दाट धुके यामुळे द्राक्षबागाना डाऊनी,भुरी वा चिकट्या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.त्यामुळे बळीराजाला रात्रंनदिवस हावमानाचा वेध घेत औषध फवारणी यंत्रासह बागेत थांबावे लागत आहे.
काही दिवसांपूर्वी झालेल्या परतीच्या पावसाने द्राक्ष पीकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.त्यामुळे अगाप छाटणी घेतलेल्या बागांत फळकुज झाली आहे.तर सध्या पडत असलेल्या दुपारी कडाक्याचे ऊन रात्री बोचरी थंडी तर पहाटे दाट धुके यामुळे द्राक्ष बागांवर डाऊनी,भुरी वा चिकट्या रोगांचा प्रादुर्भाव जाणवत आहे.
 त्यामुळे त्यापासून द्राक्ष बागा वाचविण्यासाठी बळीराजाला महागड्या औषधांची फवारणी करावी लागत आहे.त्यामुळे या खर्चाने तो चांगलाच मेटाकुटीला आला आहे.चालूवर्षी मार्च,एप्रिल मध्ये खरड छाटणीच्या वेळी पाणी कमी पडल्याने व मे महिन्यात ऊना ऐवजी अवकाळी पाऊस झाल्याने द्राक्ष बागेसाठी लागणारे पाणी व उन समप्रमाणात न मिळाल्याने चालू वर्षी फळधारणाही चांगली झाली नाही.त्याचाही फटका द्राक्ष उत्पादनास बसणार आहे.
चालू वर्षी द्राक्ष बागेत कमी प्रमाणात द्राक्ष घड असल्याने आपसूकच द्राक्ष उत्पादनही घटले जाणार आहे.त्याचा फटका द्राक्ष उत्पादनास व बेदाणा निर्मितीसही होणार आहे.त्याची झळ आपसुकच द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे हे मात्र खरे आहे.
 आगाप छाटणी घेतलेली माझ्या द्राक्षबागेस परतीच्या पावसाचा मोठा फटाका बसला असुन फळकुज जादा झाल्याने त्याचा परिणाम द्राक्ष उत्पादनावर झाला आहे.त्याचा अर्थीक तोटा सहन करावा लागणार आहे.

-- प्रशांत तुकाराम शिंदे.
(द्राक्ष बागायतदार घाटनांद्रे. १)परतीच्या पावसाने फळकुज झालेली प्रशांत शिंदे यांची द्राक्ष पीक.- छाया-जालिंदर शिंदे.२) शेतकरी प्रशांत शिंदे घाटनांद्रे